सांगली : संक्रांतीचा सण तोंडावर येईल तसा तीळ आणि गूळ भाव खाऊ लागला आहे. गावरान तीळ १५० ते २४० रुपये किलोने विकले जात आहे, तर गूळ ४२ रुपयांवर पोहोचला आहे. तुलनेने साखर मात्र स्थिर आहे.
तिळाची शेती पश्चिम महाराष्ट्रातून हद्दपार झाल्यानंतर जिल्हा सर्वस्वी आयातीवर अवलंबून आहे. एरवी फक्त मसाल्यांसाठीच लागणारे तीळ संक्रांतीला मात्र भाव खाते. बाजरीच्या भाकरी, तिळगूळाच्या रेवड्या, लाडू यासाठी पांढरा शुभ्र तीळ पसंत केला जातो. पॉलीश केलेला हा तीळ खायला बेचव असला तरी दिसायला आकर्षक असतो. सध्या २०० ते २४० रुपये किलोने विकला जात आहे.
चवीला चांगले आणि पोषक तत्वे असणारे गावरान तीळ १२० ते १५० रुपयांनी उपलब्ध आहे. २५ किलोचे पोते ३००० रुपये घाऊक दराने मिळते. किरकोळ बाजारात १५ रुपयांना दहा ग्राम दर सुरु आहे. सुगरण महिलांची गावरान तिळालाच पसंती आहे.तीळ १५० रुपये
गावरान तीळ १२० रुपये किलो या घाऊक दराने मिळत आहे. सामान्य ग्राहक ५०-१०० ग्रामने खरेदी करतो. त्यावेळी १५० रुपये किलो असा दर पडतो. पॉलीश केलेले पांढरे शुभ्र तीळ दिसायला आकर्षक असल्याने भावही २०० रुपयांवर आहे.
गुळ ४२ रुपये
गूळाचा सरासरी दर ३५ रुपये सुरु आहे. किरकोळ बाजारात ३८ रुपये किलोने विकला जात आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून गूळाचा बाजार स्थिर आहे.
साखर ३८ रुपये
शुभ्र आणि दाणेदार साखर ३८ रुपयांवर स्थिर आहे. घाऊक बाजारात ३५ रुपये किलोने विकली जात आहे. दिवाळीत ४० रुपयांपर्यंत पोहोचली होती. सध्या मात्र दर स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.संक्रांतीला बाजरीच्या भाकरीला लावण्यासाठी तिळाची चौकशी केली. दर कितीही असला तरी १००-१५० ग्राम तरी घ्यावेच लागते. गूळ ४० वर गेल्याने घरगुती तिळगुळाऐवजी रेडिमेड रेवड्या परवडतात. - रेखा गाडेकर, गृहिणी
दिवाळीपासून गूळाचा बाजार स्थिर आहे. सांगली व कोल्हापुरचा गूळ ४२ रुपयांवर आहे. आठवडाभरात दरवाढीची शक्यता आहे. संक्रांतीसाठी सेंद्रिय गुळाला मोठी मागणी आहे.
- धोंडिराम कापसे, व्यापारी
---------