खरसुंडी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथे विद्युत खांबांवरील धोकादायक तारांची उंची वाढविण्याचे काम महावितरणकडून पूर्ण करण्यात आले आहे.
येथील प्रमुख एसटी बसस्थानक चौक ते जिल्हा परिषद शाळेपर्यंत विजेच्या खांबांवरील विद्युत तारा धोकादायक बनल्या होत्या. या रस्त्याने अवजड वाहतूक होत असल्याने विजेच्या तारांना वाहनांचा स्पर्श होऊन दुर्घटना होण्याचा धोका निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर खरसुंडी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष लालासाहेब भिसे यांनी महावितरणचे उपअभियंता व्ही. एन. मंडल यांना निवेदन देऊन तातडीने विजेच्या तारांची उंची वाढविण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत महावितरण विभागाने २४ तासांच्या आतच धोकादायक विजेच्या तारेची उंची वाढविण्याचे काम पूर्ण केले. यामुळे खरसुंडी ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.