नाशिक : सन २०१५-१६ या वर्षात शहर व परिसरात उद्भवलेल्या पाणीटंचाईमुळे महापालिकेच्या खत विक्रीवरही परिणाम झाला असून, १५१६ मे. टन उत्पादित खतापैकी ८१२ मे. टन खतच विक्री होऊ शकले आहे. येत्या पावसाळ्यात हवामान खात्याने चांगल्या पावसाचे अंदाज वर्तविल्याने यंदा महापालिकेच्या सेंद्रीय खताला मागणी वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने भूजल पातळीतही मोठ्या प्रमाणावर घट झाली असून, पाणीटंचाईचा परिणाम नागरी वस्तीबरोबरच शेतीवरही झाला आहे. महापालिकेच्या वतीने पांडवलेणी परिसरात उभारण्यात आलेल्या खतप्रकल्पावर कचऱ्यापासून सेंद्रीय खताची निर्मिती केली जाते. या खताला परिसरातील शेतकऱ्यांची चांगली मागणी असते. मात्र, सन २०१५-१६ या वर्षात उद्भवलेल्या पाणीटंचाईचा फटका शेतीलाही बसला आहे. त्यामुळे महापालिकेच्या खतविक्रीवरही त्याचा परिणाम झाला आहे. सन २०१५-१६ या वर्षात खतप्रकल्पात १५१६ मे.टन खताचे उत्पादन झाले. त्यातील ८१२ टन खताचीच विक्री होऊ शकली. त्यातून महापालिकेला २३ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. आजमितीला सुमारे १५०० मे. टन खत विक्रीअभावी शिल्लक आहे. खतप्रकल्पावर दररोज सुमारे ३५० ते ३७५ मे. टन कचरा प्रक्रियेसाठी घंटागाड्यांमार्फत आणला जातो. त्यावर प्रक्रिया होऊन रोज एक ते दीड टक्के खताची निर्मिती होते. दरवर्षी खतप्रकल्पावर सरासरी १००० ते ११०० टन खताची निर्मिती होते. मात्र गेल्यावर्षी १५१६ टन खत निर्मिती होऊनही केवळ निम्म्यानेच खताची विक्री होऊ शकली आहे. महापालिकेकडून सदर खत हे लूजमध्ये २५०० रुपये प्रतिटन, तर गोण्यांद्वारे प्रतिटन ३००० रुपये दराने विक्री केले जाते. ४५ किलोची एक गोणी १४० रुपयांना विक्री होते.
तासगाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Updated: May 11, 2016 00:09 IST