:
कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथील खोल पाणंदीपासून पुढे शेळके-डंके-कदम-सावंत मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनी केलेली अतिक्रमणे तात्काळ दूर करून पूर्वीप्रमाणे ३३ फुटी रस्ता खुला करून मिळावा, अशी मागणी कामेरी येथील शेतकरी संघर्ष समितीचे प्रमुख बंडाकाका पाटील यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शेतकऱ्यांना आपला ऊस बाहेर काढण्यासाठी हा महतत्त्वाचा पाणंद रस्ता असल्याने काही वर्षापूर्वी साखर कारखान्यांनी अतिक्रमणे दूर करून ३३ फुटी रस्ता मुरुमीकरण करून दिला होता. मात्र सध्या बाजूच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमणे केल्याने रस्ता अरुंद झाला आहे. रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनी खोल चरी काढल्यामुळे ऊस वाहतुकीसाठी हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. या भागातील १५० एकरापेक्षा जास्त उसाला कारखान्याच्या तोडी येऊनही ऊसतोडणी कामगार व वाहन मालक हे ऊस तोडणीसाठी नकार देत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. वेळेत ऊस तोडणी सुरू होण्याच्यादृष्टीने तहसीलदार यांनी रस्त्याची चार दिवसात प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना अतिक्रमणे दूर करण्यास सांगावे, अशी मागणी या निवेदनात केली आहे.
नायब तहसीलदार धनश्री भांबुरे यांनी तहसीलदार यांच्यावतीने हे निवेदन स्वीकारले. तात्काळ या रस्त्याची पाहणी करून अतिक्रमणे दूर करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन या शेतकरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला दिले.
यावेळी भगवान कदम, तुकाराम पाटील, दिनेश जाधव, योगेश पाटील, पोपट कदम, महेश शेळके, माणिक शेळके, बबलू निंबाळकर, सर्जेराव शेळके, विश्वास निंबाळकर उपस्थित होते.
फोटो ओळी :
कामेरी (ता. वाळवा) येथील खोल पाणंद रस्त्यालगत अतिक्रमणे दूर करण्यासाठी नायब तहसीलदार धनश्री भांबुरे यांना निवेदन दिले. यावेळी भगवान कदम, पोपट कदम, तुकाराम पाटील, दिनेश जाधव, योगेश पाटील आदी उपस्थित होते.