इस्लामपूर : इस्लामपूर येथे येत्या १५ दिवसात वाहन पासिंगसाठी पासिंग ट्रॅक न झाल्यास रिक्षा चालक - मालक आणि इतर वाहनधारकांच्यावतीने तहसील कार्यालयास घेराव घालून कामकाज बंद पाडण्याचा इशारा नगरसेवक विक्रमभाऊ पाटील आणि सनी खराडे यांनी दिला आहे.
येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील अधिकारी सागर चौगुले, विष्णू चव्हाण यांना संघटनेच्यावतीने घेराव घालण्यात आला. या आंदोलनात वाळवा, शिराळा आणि पलूस तालुक्यातील रिक्षा चालक - मालकांनी भाग घेतला होता. घोषणाबाजी करत आंदोलकांनी हा परिसर दणाणून सोडला.
विक्रम पाटील म्हणाले, या तालुक्यातून १० कोटीपेक्षा अधिक कर जमा होतो. वाहनचालकांनी यापूर्वी मागणी करूनसुद्धा शासन आणि अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नाही. वाहनधारकांना पासिंगसाठी आर्थिक भुर्दंड सोसून सांगलीला जावे लागते. अधिकाऱ्यांच्या बेताल वक्तव्याने मानहानी केली जाते. या छोट्या व्यावसायिकांवर अन्याय केला जातो. या सर्व बाबी थांबवून येत्या १५ दिवसात पासिंग ट्रॅक झाला पाहिजे अन्यथा तीव्र आंदोलन करू.
सनी खराडे म्हणाले, अनेकवेळा मागणी करूनही अधिकारी दाद देत नाहीत. भविष्यकाळात याचे मोठे परिणाम भोगावे लागतील. रिक्षा चालकांवरील अन्याय सहन केला जाणार नाही.
यावेळी विश्वनाथ पालकर, अनिल मंडले, अर्जुन पाटील, महादेव होगाडे, नामदेव शेवाळे, जाफर मुल्ला, अय्याज पटेल, संजय गवरे, राजेंद्र जाधव, अजय नाटेकर, महंमद जमादार, राजेंद्र पोरे, रियाज शेख उपस्थित होते.
फोटो : १५ इस्लामपूर १