इस्लामपूर : राज्य सरकारने राज्यातील वीजग्राहकांना वीज बिल माफीचे दिलेल्या आश्वासनाला हरताळ फसलेला आहे. ‘महावितरण’च्या कंपनीने नोटीस, फोनद्वारे नागरिकांना तत्काळ वीज बिल भरावे. अन्यथा वीज कनेक्शन तोडू अशी खुलेआम धमकीसुत्र सुरू आहे. ते तत्काळ थांबवावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने वीजपुरवठा तोडायला जर कोणी आले तर त्याचे हात पाय तोडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांनी दिला.
जाधव म्हणाले, सांगली जिल्हात कोरोनाच्या काळात राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला. ६ ते ७ माहिन्यांच्या काळात रोजीरोटीच गेल्याने गरीब, कष्टकरी, मध्यमवर्गीय लोकांची मोठी आर्थिक दमछाक झाली. या काळात संपूर्ण उद्योग बंद पडले. शेतकऱ्याचा माल सडून गेला. देशातीत केरळ, मध्यप्रदेश, गुजरात राज्यात ५० टक्के घरगुती बिलामध्ये सवलत दिली आहे. पण प्रगत महाराष्ट्र सरकाराने अद्याप निर्णय घेतलेला नाही. हे महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावे लागेल.
राज्य सरकारकडून ऊर्जामंत्री नितीन राऊत यानी महाराष्ट्रातील जनतेला दिवाळीपूर्वी गोड बातमी देऊ, असे सांगून जनतेची फसवणूक केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट देऊन शेतकऱ्यांची कैफियत मांडली. लॉकडाऊन काळात ३०० ते ४०० युनिटपर्यंत वीजग्राहकांना माफी द्यावी, ही संघटनेची मागणी असताना वीज वितरण कंपनीकडून वीज तोडू, असे वारंवार सांगितले जात आहे. यामुळे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्याची जबाबदारी महावितरणवर राहील. ‘महावितरण’ची धमकी कदापि खपवून घेतली जाणार नाही.