सांगली : जिल्ह्यात लसीकरण सुरू झाले असले तरी ते अद्याप पहिल्या टप्प्यातच आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनंतर आता शासकीय कर्मचारी व पोलिसांना लस टोचली जात आहे, शिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांचा दुसरा टप्पाही १६ फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. लसीकरणाची गती पाहता जिल्ह्याच्या सुमारे ३२ लाख लोकसंख्येला लसीकरण करण्यासाठी तर पाच वर्षेही पुरणार नाहीत अशी स्थिती आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे ८०,३३० डोस आतापर्यंत मिळाले आहेत, त्यातील ५१,३६० डोस लसीकरणासाठी वितरीत झाले आहेत. आणखी काही डोस येत्या आठवड्यात येणार आहेत. लसीकरणासाठी २९ हजार ९०० जणांची नोंद झाली आहे, पण दररोजचे सरासरी लसीकरण ५०० ते ६०० इतकेच आहे. आरोग्य कर्मचारी व फ्रन्टलाइन वर्कर्स यांच्यापर्यंतच सध्या लस उपलब्ध आहे. सामान्य लोकांसाठी मार्चनंतर उपलब्धतेची शक्यता आहे. लसीकरणाची गती अशीच मंद राहिली तर संपूर्ण जिल्ह्याचे लसीकरण करायला पाच वर्षेही पुरणार नाहीत अशी स्थिती आहे. त्यातच पहिल्या लसीकरणानंतर २८ दिवसांनी दुसरा डोसही घ्यावा लागणार आहे. हा विचार करता जिल्ह्याला लसीकरणामध्ये अद्याप बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे हे स्पष्ट आहे.
लसीकरणामध्ये सुरुवातीला ॲपमधील तांत्रिक दोष अडथळा ठरले, आता लोकांची नकारात्मक मानसिकता आडवी येत आहे. कोरोना संपला, आता कशाला लस पाहिजे, अशी मानसिकताही तयार झाली आहे.
पॉईंटर्स
जिल्ह्यात दररोज दिली जाणारी लस - सरासरी ५५०
आतापर्यंत झालेले लसीकरण - १८३९१
दररोज केंद्रनिहाय लस -
सांगली सिव्हिल - ८०
मिरज सिव्हिल - ६०
भारती रुग्णालय - ११०
इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालय - ६९
तासगाव ग्रामीण रुग्णालय - ६०
जत ग्रामीण रुग्णालय - ५५
कडेगाव ग्रामीण रुग्णालय - १०
आष्टा ग्रामीण रुग्णालय - ६१
आटपाडी ग्रामीण रुग्णालय - ६०
विटा ग्रामीण रुग्णालय - ५५
शिराळा उपजिल्हा रुग्णालय - ५५
कवलापूर आरोग्य केंद्र - १२६
पलूस आरोग्य केंद्र - ३६
चौकटलस मुबलक, घेणारेच पाहिजेत !
जिल्ह्यात लसींचा पुरेसा साठा उपलब्ध असला तरी लसीकरणाचा वेग अपेक्षेप्रमाणे नाही. आरोग्य यंत्रणेसह महसूल व पोलीस यंत्रणेतील लाभार्थीही लस घेण्यासाठी पुढे येताना दिसत नाहीत. ॲलर्जी आहे, आजारी आहे, मधुमेह-रक्तदाबाचा विकार आहे अशा अनेक कारणे सांगून लसीकरण टाळण्याकडे कल दिसतो. त्यामुळे नोंदणी झाल्याप्रमाणे लसीकरण होईन झाले आहे. दुसरा डोस सुरू झाला तरी पहिल्या टप्प्यातील नोंदणीच्या १०० टक्के लसीकरण होऊ शकले नाही. लसीच्या परिणामांची नाहक भीती मनात ठाण मांडून आहे.
चौकट
दहा दिवसांत ११४ रुग्ण वाढले
गेल्या दहा दिवसांत जिल्ह्यात ११४ नव्या रुग्णांची नोंद झाली, त्यातील सर्वाधिक म्हणजे २४ रुग्ण १० फेब्रुवारीस आढळले. जिल्ह्याची दररोजची सरासरी रुग्णसंख्या दहापर्यंत आहे. लसीकरण सुरू असले तरी रुग्णवाढीचा वेगही फारसा नाही. त्यामुळेच लोकांचा आत्मविश्वास वाढला असून, लसीकरणाकडे ते पाठ फिरवत आहेत.
कोट
लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात नोंदणी झालेल्या सर्वांचेच लसीकरण होऊ शकले नाही. प्रतिसाद वाढावा यासाठी प्रयत्न करत आहोत. लस सुरक्षित असून, सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ती टोचून घेतली आहे, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. कोविन ॲपमधील दोषांचेही निराकरण झाले आहे, त्यामुळे लसीकरणाचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न करत आहोत. लाभार्थींनी निशंकपणे पुढे यावे.
- डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा आरोग्याधिकारी