वाळवा : हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याचा इथेनाॅल प्रकल्प सुरू आहे. यामध्ये तांत्रिक बदल करून प्रतिदिन आठ ते दहा टन ऑक्सिजनची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, भारतात कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यांच्या सुरक्षित जीवनासाठी ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. आपला इथेनाॅल प्रकल्प सध्या सुरू आहे. यात काही तांत्रिक बदल करून शास्त्रीय पध्दतीने हवेतील वायुद्वारे ऑक्सिजनची निर्मिती करता येते.
याबाबत शास्त्रीय तंत्रज्ञानाचा सल्ला घेऊन प्रतिदिन आठ ते दहा टन ऑक्सिजन निर्मिती करण्याचा प्रकल्प उभा करण्याचे कारखान्याने ठरविले आहे. त्यादृष्टीने कामकाज सुरू केले जाईल. ऑक्सिजन निर्माण करून आरोग्य क्षेत्रांस पुरवठा करण्यात येईल.