आष्टा : आष्टा ही सहकार पंढरी म्हणून ओळखली जाते. या सहकार पंढरीत माजी आमदार विलासराव शिंदे व माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या प्रयत्नाने शनिवार दि. ३० रोजी दुपारी ३ वाजता हळदीचे सौदे सुरू होणार आहेत. सहकार पंढरीला हळदीची झळाळी मिळाल्याने आष्ट्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. आष्टा महाराष्ट्रातील सर्वाधिक शेतीक्षेत्र असणारे गाव म्हणून ओळखले जाते. पूर्वी पाणी नसल्याने ज्वारी, बाजरी, गहू, भुईमूग, हरभरा अशी कमी पाण्याची पिके घेतली जात होती. मात्र माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रयत्नाने आष्ट्यासह जिल्ह्यात कृष्णा व वारणा नदीवरून शेतीसाठी पाणी आणण्यात आले. साखर कारखाने जास्त असल्याने ऊसाचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यात येऊ लागले. सांगली ही हळदीची देशातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने त्याठिकाणीच हळद पाटविण्यात येत आहे. ऊस पिकांच्या अनेक समस्यांमुळे शेतकऱ्यांनी हळद लागवडीकडे मोर्चा वळवला आहे. आष्टा, कारंदवाडी, मर्दवाडी, मिरजवाडी, वाळवा, बागणी, बावची, दुधगाव या परिसरातील शेतकऱ्यांनी प्रतिवर्षी हळदीचे उच्चांकी उत्पादन घेतले आहे. ऊसाला १८ महिन्यापर्यंत कालावधी जात आहे. व उत्पादनही कमी मिळत आहे. मुळास सुपीक जमिनीमध्ये उच्च गुणवत्तेची हळत मिळत आहे. एकरी खर्च एक लाख गेला तरी ३५ ते ४० क्विंटल उत्पादन मिळत आहे. कमीत कमी ८ ते १० तर त्यापेक्षा १२ ते १५ हजारापर्यंत क्विंटलला दर मिळाल्याने लाखो रुपये उत्पन्न मिळून जमिनीची सुपीकताही टिकत असल्याने या परिसरात हळदीची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. वाळवा ताुलक्यात सुमारे अडीच हजार हेक्टर हळद लागवड झाली आहे. एकरी ३० क्विंटलप्रमाणे सुमारे साडेसात हजार क्ंिवटल उत्पादन एकूण हळदीची २१ कोटीची उलाढाल होत आहे. आष्टा येथे हळदीची बाजारपेठ व्हावी अशी अनेक शेतकऱ्यांची मागणी होती. माजी आ. विलासराव शिंदे, आ. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आष्टा येथे हळद उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावाही घेण्यात आला आहे. यावेळी आ. पाटील यांनी ऊसाच्या एफ.आर.पी.चा प्रशन निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसमोर हळदीचा पर्याय उपलब्ध झाल्याचे सांगितले.चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष गोपाळ मर्दा, हळद संशोधन केंद्र कसबे डिग्रजचे डॉ. जितेंद्र कदम, कृषीभूषण संजीव माने, सभापती आनंदराव पाटील, सुरेश गावडे, विलासराव शिंदे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. व आष्टा येथे लवकरच हळद सौदे सुरू करण्याचे वचन दिले. आ. पाटील व शिंदे यांनी शेतकरी व अडतदार व्यापाऱ्यांना सर्व सुविधा देण्यात येणार आहेत. (वार्ताहर)वाहतूक खर्चात बचत : शेतकऱ्यांसमोर वजनआष्टा या सहकार पंढरीत हळदीची बाजारपेठ सुरू होत असल्याने शेतकऱ्यांच्या वाहतूक खर्चात तर बचत होणार आहेच. शिवाय इलेक्ट्रिक वजन काट्यावर हळदीचे बरोबर वजन शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर होणार असल्याने शेतकऱ्यांना योग्य दर मिळाल्याने फायदाच होणार आहे. हळद बााजरपेठेचे विस्तार झाल्यास आष्ट्यात हळद पूड निर्मितीचे कारखानेही सुरू होऊन आष्ट्यातील उद्योग व्यवसाय वाढून गावाचा औद्योगिक विकास होणार आहे.
आष्ट्यात उद्यापासून हळदीचे सौदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2016 00:30 IST