लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : भगवान महावीर कोविड हॉस्पिटलचे मुख्य समन्वयक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी सांगलीतील कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहाचे अवघ्या ५ दिवसांत कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्याची किमया केली आहे. हे त्यांचे कार्य समाजासाठी आदर्शवत व
प्रेगणादायी ठरणारे आहे, असे गौरवोद्गार कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी काढले.
त्यांनी या रुग्णालयास भेट दिली. यावेळी ते म्हणाले, जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता सामाजिक, शैक्षणिक, सहकारी संस्था, दानशूर व्यक्तीने या संकटकाळात आपल्या परीने सर्वतोपरी मदत करणे गरजेचे आहे. समस्त जैन समाजातील दानशूर व्यक्तींनी, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी यांच्या सहकार्याने श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्ट संचलित भगवान महावीर हॉस्पिटल उभारले आहे. त्यांचे हे सामाजिक कार्य कायम लक्षात राहील. अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी युक्त ४० बेडस्चे हॉस्पिटल, तसेच २० अक्सिजन बेडस्ची व्यवस्था येथे करण्यात आल्री आहे. हे हॉस्पिटल सर्वसामान्य, गरजू नागरिकांना उपयुक्त ठरत असून, याचा आदर्श समाजाने घेतल्यास कोरोनावर आपण लवकरच मात करू शकतो. यावेळी काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेवक मंगेश चव्हाण, राजगोंडा पाटील वसंत पाटील, सुभाष देसाई व ट्रस्टचे कार्यकर्ते उपस्थित होते.