कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथे केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर संमत केलेले शेतकरीविरोधी कृषी कायदे तात्काळ मागे घ्यावेत, म्हणून कृषी विधेयक कायद्याची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला. कायदा रद्द न केल्यास माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी सरचिटणीस धैर्यशील पाटील यांनी दिला आहे.
देशातील शेतकऱ्यांचा कृषी विधेयकाला तीव्र विरोध आहे. याविरोधात ते आंदोलन करीत आहेत. दिल्लीत कडाक्याच्या थंडीत सुरू असलेल्या आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांवर वॉटर कॅनन चालवून तसेच लाठीचार्ज करून, सुरू असलेले आंदोलन मोडून काढण्याचा घाट भाजपने घातला आहे. याविरोधात देशातील सर्व शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नये. अन्यथा देशात फार मोठा उद्रेक होईल.
यावेळी स्वाभिमानीचे तालुका उपाध्यक्ष खाशेराव निंबाळकर, आनंदराव शेळके, प्रकाश पाटील, बाळासाहेब पाटील, वसंत पाटील, सदाशिव पाटील, प्रमोद पाटील, अतुल माळी, अशोक पाटील, तसेच व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मानसिंग पाटील यांनीही पाठिंबा दिला. गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून ग्रामस्थांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.
फोटो -०८१२२०२०-आयएसएलएम- कामेरी न्यूज
कामेरीत शेतकरीविरोधी कृषी कायद्याची होळी करून खाशेराव निंबाळकर, आनंदराव शेळके, प्रकाश पाटील, धैर्यशील पाटील, मानसिंग पाटील यांनी निषेध केला.