लोकमत न्यूज नेटवर्क
दिघंची : दिघंची, ता. आटपाडी येथे बुधवारी सायंकाळी ७ वाजता विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. उकाड्याने हैराण झालेल्या दिघंचीकरांना गारवा मिळाला. पाण्याविना करपू लागलेल्या पिकांनाही दिलासा मिळाला आहे.
दिवसभर ढगांची दाटी होऊन ढगाळ वातावरण तयार झाले. वादळी वाऱ्यासह पावसाने सायंकाळी हजेरी लावली. दहा मिनिटांत सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. दिघंची परिसरात सध्या मशागतीची कामे सुरू आहेत. सोमवारी काही प्रमाणात पाऊस झाला होता. बुधवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे अनेकांच्या शेतात पाणी साचून राहिले आहे.
सततच्या वातावरणातील बदलामुळे डाळिंब या पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. मुसळधार झालेल्या पावसामुळे पाण्याविना करपू लागलेल्या पिकांना हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे.