सांगली : सांगलीत सकल ओबीसींचा महामेळावा गुरुवारी (दि. २५) होत आहे. तो यशस्वी करण्याचा निर्धार समन्वय समितीच्या बैठकीत झाला. स्टेशन चौकात दुपारी एक वाजता होणाऱ्या मेळाव्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेट्टीवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, लक्ष्मण वडले आदी उपस्थित राहणार आहेत.
महामेळावा समन्वय समितीचे अरुण खरमाटे, बाळासाहेब गुरव, शशिकांत गायकवाड आदींनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. खरमाटे म्हणाले, सांगलीत २५ फेब्रुवारीलाच मेळावा होईल, यामध्ये दुमत नाही. जिल्ह्यातील ओबीसी कोणत्याही एका दावणीला संघटना बांधणार नाही. याचे श्रेय दामटण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. ओबीसी आरक्षणाच्या सुरक्षिततेसाठी आम्ही संघटितरित्या लढा देऊ.
दरम्यान, गुरुवारी दुपारी ओबीसीतील घटक पक्षांची बैठक झाली. यातील अनेक घटकांनी मेळाव्याला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. आनंदराव वाघमोडे, अशोक गुरव, राजेंद्र नागरगोजे, लक्ष्मण देसाई आदी उपस्थित होते. महामेळाव्याला प्रतापराव गुरव, बाळासाहेब सानप, सोमनाथ काशिद हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
खरमाटे यांनी मांडलेल्या मागण्या अशा : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, आगामी जनगणना जातीनिहाय करावी, मंडल आयोगाच्या शिफारसी शंभर टक्के लागू कराव्यात, शासकीय नोकऱ्यांतील ओबीसींचा अनुशेष भरावा, भविष्यातील भरतीप्रक्रिया प्रवर्गनिहाय राबवावी, शेतीला उद्योगाचा दर्जा आणि शेतमालाला खर्चावर आधारित भाव द्यावा, क्रिमिलेअरची अट रद्द करावी, लोकसभा, विधानसभेसाठी ओबीसींना प्रतिनिधीत्व द्यावे, ओबीसी महामंडळाला १००० कोटींचे अनुदान मिळावे.