आटपाडी : थोर स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त आटपाडी येथे अभिवादन करण्यात आले.
कृषी विद्यालय आटपाडी येथे श्रमिक मुक्ती दल, समान पाणी वाटप पाणी संघर्ष चळवळीच्या वतीने क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडींच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त आण्णांच्या प्रतिमेचे पूजन पाणी चळवळीचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे खानापूर मतदार संघाचे माजी अध्यक्ष आनंदराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातल्या पिढ्यान्पिढ्या दुष्काळ पाचवीला पुजलेल्या १३ तालुक्यांमध्ये कृष्णेचे पाणी यावे म्हणून नागनाथआण्णा नायकवडी आणि डॉ. भारत पाटणकर यांनी दिलेल्या लढ्यामुळेच सर्वत्र कृष्णेचे पाणी आले आहे. दुष्काळी भागासाठी भगीरथ ठरलेल्या नागनाथआण्णांना लाखो दुष्काळग्रस्त वर्षानुवर्षे स्मरण केल्याशिवाय राहणार नाहीत, अशी भावना आनंदराव पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी सादिक खाटीक, सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर पाटील, प्रा. ज्योती गुरव, प्रा. सदाशिव वाघमारे, प्रा. योगेश सरगर, सुहास पाटील, बाबूराव भोरे आदी उपस्थित होते.