करगणी : शेटफळे (ता. आटपाडी) ग्रामपंचायतीच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ‘ग्रामपंचायत आपल्या दारी’ संकल्पना राबवली आहे. याची सुरुवात शनिवार, दि. २० पासून होणार आहे. त्यावेळी आधार कार्ड नूतनीकरण मेळावा होणार आहे.
शेटफळे ग्रामपंचायतीत सत्तांतर झाल्यानंतर नूतन पदाधिकाऱ्यांनी ‘आदर्श गाव’ बनवण्यासाठी कंबर कसली आहे. दर महिन्याला जमा होणारी घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर ग्रामनिधी तसेच पाण्याची गळती, गटार साफ करणे यांसह केला जाणारा खर्च नोटीस बोर्डावर लावला जातो. सरपंच नीता गायकवाड, उपसरपंच निवृत्ती गायकवाड, सदस्य सोमनाथ गायकवाड, विजय देवकर प्रयत्नशील आहेत. सुरुवातीला ग्रामपंचायत ‘आपल्या दारी’ या उपक्रमातून विविध समस्या सोडवल्या जाणार आहेत. याची सुरुवात आधार कार्ड मेळाव्याने केली जाणार आहे. त्यानंतर इतर विकासकामे केली जाणार आहेत. शनिवारी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आधार कार्ड दुरुस्ती आणि नूतनीकरण मेळावा सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून घेतला जाणार आहे.