सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या रब्बी हंगामात “प्रदीप सेल्स, मेन्टा रोड जालना” या कंपनीमार्फत सप्टेंबर २०२० मध्ये जिल्ह्यात जवळपास ८ टन कांदा बियाणे हजारो शेतकऱ्यांनी खरेदी केले. मात्र, या कांदा बियाण्यांची उगवण न झाल्याने सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले होते. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. याबाबतची माहिती निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी डॉ. कदम यांना दिली होती. यांची दखल घेऊन संबंधित विभागाचे अधिकारी तसेच शेतकरी व कंपनीचे प्रतिनिधी यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन केले होते.
यावेळी डॉ. कदम म्हणाले, शेतकऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये विविध प्रकारची बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्या जर शेतकऱ्यांना बोगस बियाणांची विक्री करून फसवणूक करत असतील, तर कृषी विभागाच्या वतीने यावर कठोर निर्णय घ्यावेत. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी काळजी घ्यावी. तसेच सातारा जिल्ह्यातील बोगस बियाणे विक्रीबाबत सविस्तर माहिती घेऊन कृषी विभागाच्या वतीने या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी.
बैठकीला कृषी सचिव एकनाथ डवले तसेच सहसचिव, (कृषी) व्ही.बी. पाटील, संचालक कृषी (निविष्ठा व गुणनियंत्रण) दिलीप झेंडे, अवर सचिव, उमेश आहिर तसेच शेतकऱ्यांचे प्रतिनिधी विराज शिंदे, संभाजी भोईटे, राजेंद्र कदम, विद्याधर धुमाळ आदी उपस्थित होते.
फाेटाे : ०३ ग्राम १
ओळ : मुंबई येथे बुधवारी बाेगस कृषी बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाईबाबत कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत बैठक झाली.