सांगली : गेल्या तीन वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती अखेर पुन्हा एकदा मार्गी लागली आहे. कोरोना काळातील भरतीवरील बंदीतून पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक भरती वगळण्यात येत असल्याचे परिपत्रक मंत्रालयातून कक्ष अधिकारी कविता तोंडे यांनी सोमवारी जारी केले. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी तसे ट्वीट करुन उमेदवारांना दिलासा दिला.
यामुळे आठवडाभरात पवित्र पोर्टल पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भरतीवरील बंदी उठविण्याची घोषणा केली. त्यानुसार सहा हजार जागांवरील भरती प्रक्रिया लवकरच सुरु होईल. पहिल्या टप्प्यात कोरोनापूर्वी सहा हजार जागा भरल्या होत्या. २०१७ पासून भरती प्रक्रिया सुरु होती. ती लवकर पूर्ण झाली नाही, तर अनेक उमेदवार वयोमर्यादा ओलांडण्याच्या सीमेवर आहेत. त्यामुळे नव्या भरती प्रक्रियेकडे त्यांचे डोळे लागून राहिले आहेत.
कोट
महाविकास आघाडी सरकारने कोरोनामुळे सर्वच प्रकारच्या पद भरतीला बंदी घातली होती, पण यातून शिक्षक भरती वगळल्याने उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. मागासवर्गीयांच्या ५० टक्के रिक्त जागांसह होणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेचे आम्ही स्वागत करतो. राज्यातील गोरगरीब आणि शेतकरी पुत्रांचे शिक्षक होण्याचे स्वप्न लवकरच सत्यात येईल.
प्रा. अर्जुन सूरपल्ली, राज्याध्यक्ष, पवित्र शिक्षक संघर्ष समिती
--------------