सांगली : दीड दिवसाच्या गणपतीबाप्पांना आज (शनिवारी) भावपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. कृष्णा नदीच्या घाटावर तसेच विविध उपनगरांत ठेवण्यात आलेल्या काहिलीमध्ये गणरायाचे ‘पुढच्या वर्षी लवकर याऽऽ’च्या जयघोषात विसर्जन केले. सकाळपासून सुरू असलेल्या वरुणराजाने सायंकाळी थोडी विश्रांती घेतल्याने भक्तांनी पायी चालत जाऊन गणेशाला निरोप दिला. शुक्रवारी सकाळी वाजतगाजत गणेशाचे आगमन झाले होते. आज दीड दिवसाच्या घरगुती गणरायांना निरोप देण्यात आला. उपनगरातील भक्तांना विसर्जनासाठी नदीवर यायला लागू नये यासाठी महापालिकेतर्फे काही उपनगरांमध्ये मोठ्या काहिलीची व्यवस्था केली होती. त्याच्याजवळच निर्माल्य कलश ठेवण्यात आला होता. नदीकाठावर देखील महापालिका प्रशासनातर्फे विसर्जनाची चोख व्यवस्था करण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वरुणराजाने सायंकाळी विश्रांती घेतली व गणेशभक्तांना दिलासा दिला. दरम्यान, निर्माल्य नदीत टाकू नये यासाठी स्वयंसेवी संस्थाचे कार्यकर्ते नदीकडेला थांबून होते. त्यांच्याकडून गणेशभक्तांकडून निर्माल्य गोळा करण्यात येत होते. यापुढेही ही सेवा देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
दीड दिवसाच्या बाप्पांना निरोप
By admin | Updated: August 31, 2014 00:14 IST