लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : परिसंस्थांचे पुनरुज्जीवन होण्यासाठी स्थानिक वृक्षांची लागवड करण्यास प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन शिराळा प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी सुशांत काळे यांनी केले.
करमाळे (ता. शिराळा) येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना पर्यावरण संवर्धन आणि बांबू लागवड याविषयी मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत आणि तीळगंगा नदी पुनरुज्जीवन कृती गटातर्फे वृक्षारोपण करण्यात आले. सुरुवातीला गावातील प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्यात येणार आहेत. या उपक्रमांतर्गत करमाळे - औंढी रस्त्यालगत गूळभेंडी या स्थानिक झाडांची रोपे वनपरिक्षेत्र अधिकारी काळे यांच्या हस्ते लावण्यात आली.
काळे म्हणाले, वृक्षारोपण करत असताना स्थानिक प्रजातींच्या झाडांची निवड करण्यात यावी. यामुळे स्थानिक परिसंस्थांचे पुनरुज्जीवन होईल. त्यांनी शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी मार्गदर्शन केले. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर यंदा बांबू लागवड करावी. नंतर शासकीय योजनेतून बांबूशेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे.
यावेळी सरपंच संध्या कदम, ग्राम विकास अधिकारी राजेश सूर्यवंशी, माजी पोलीस पाटील राजाराम पाटील, ग्रामपंचायत सदस्य पिनू पाटील, संभाजी पाटील, सचिन कदम, अमोल पवार, अमर पाटील, सुनील पाटील, हणमंत पाटील, राहुल कदम, हणमंत पवार, स्वप्निल पाटील, आदी उपस्थित होते.