इस्लामपूर : अनेक दशकांपासून सकाळच्या वेळेत भरणाऱ्या गणेश भाजी मंडईतील स्थलांतराचा प्रश्न निकाली काढत स्थानिक नागरिकांना आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याचे काटेकोर पालन आणि नियोजन करून गणेश भाजी मंडई भरविण्यात यावी, असा निर्णय पालिकेच्या सभेत घेण्यात आला. त्यामुळे कपिल ओसवाल, शाकीर तांबोळी यांच्या नेतृत्वाखालील वाळवा तालुका संघर्ष समितीच्या लढ्याला यश आले.
पालिका प्रशासनाने शिराळा नाका परिसरात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईत जुन्या गणेश मंडईतील शेतकरी, व्यापाऱ्यांना स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरून प्रशासन आणि भाजी विक्रेत्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संघर्ष समितीने ही मंडई व्यापारी, शेतकरी व नागरिकांच्या दृष्टीने सोयीची आहे. या मंडईला अनेक दशकांचा इतिहास आहे. त्यामुळे ती तेथेच भरविण्यात यावी, अशी भूमिका घेतली होती.
पालिका सभेत नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी गणेश भाजी मंडईत भाजीपाला बाजार भरविण्याचा निर्णय घेताना त्या परिसरातील स्थानिक नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, स्वच्छता राहील आणि वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले. मंगळवारी सकाळी त्यांनी मंडईला भेट देऊन व्यापारी व नागरिकांशी संवाद साधला. विक्रेत्यांच्या वतीने नगराध्यक्ष पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नगरसेवक वैभव पवार, शाकीर तांबोळी, कपिल ओसवाल, गजानन फल्ले, मन्सूर वाठारकर, हमीद अत्तार, सुमंत कुलकर्णी, भास्कर कदम, पक्षप्रतोद विक्रम पाटील, शकील सय्यद, प्रदीप लोहार, अन्नपूर्णा फल्ले उपस्थित होते.
फोटो - २३०२२०२१-आयएसएलएम-भाजी मंडई न्यूज
इस्लामपूर येथील गणेश भाजी मंडई पूर्ववतपणे भरल्यानंतर नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.