सांगली : शहरातील चैत्रबन सोसायटी ते महावीर वे ब्रीजपर्यंतच्या नाल्यासाठी दहा कोटींचा निधी मंजूर झाला; पण राजकीय आकसापोटी हा निधी अन्यत्र वळविला जात आहे. शासनाकडून मंजूर कामाप्रमाणेच चैत्रबन नाला बांधीव करावा, अशी मागणी नागरिकांच्यावतीने पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे करण्यात आली.
नगरसेवक संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली चैत्रबन नाला परिसरातील नागरिकांनी पालकमंत्री पाटील यांची भेट घेतली. शहरातील चैत्रबन सोसायटी ते महावीर वे ब्रिजपर्यंतच्या नाल्यासाठी दहा कोटींचा निधी मंजूर करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यासाठी संतोष पाटील यांनी प्रयत्न केला. निधी मंजूर झाल्यानंतर राजकीय आकसापोटी काहींनी हे काम डावलण्याचा प्रयत्न केला आहे. चैत्रबन हौसिंग सोसायटी, टी. के. पाटील सोसायटी, तुळजाईनगर, वाघमोडे सोसायटी, सिद्धेश्वर सोसायटी, आरवाडे पार्क, नेहरूनगर, मयूर हडको कॉलनी, महात्मा गांधी कॉलनी, पुण्यश्री नगरी या परिसरात गेल्या पंधरा वर्षांपासून नाल्याचे पाणी घरांमध्ये येत आहे. लोकांचे अतोनात नुकसान होत आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा हेतूने हे काम मंजूर केले होते. त्यामुळे मूळ मंजूर ठिकाणीच हे काम करावे, अशी मागणी नागरिकांच्यावतीने करण्यात आली.