लोकमत न्यूज नेटवर्क
पुनवत : सागाव (ता. शिराळा) येथे निशा पवार यांनी उभारलेल्या बापूजी गांडूळ खत प्रकल्पाचे पुराने अतोनात नुकसान झाले आहे. या प्रकल्पातील साहित्य तसेच गांडुळे पुरात वाहून गेली आहेत.
सागाव येथे निशा पवार यांनी शेती विषमुक्त करण्याच्या उद्देशाने सेंद्रिय खत निर्माण करणारा गांडूळ प्रकल्प उभा केला आहे. सागाव - सरुड रोडवर गतवर्षीपासून सुरू केलेल्या या प्रकल्पातून वार्षिक १०० टन गांडूळ खताची निर्मिती होत होती.
बांधीव अणि खुले बेड असे एकूण चाळीस बेड गांडुळ खत निर्मितीसाठी तयार केले होते. वारणेच्या महापुरात ते सर्व दोन दिवस पाण्याखाली गेले. त्यामुळे नवीन भरलेले बेड पाण्याबरोबर वाहून गेले. पवार यांनी या प्रकल्पासाठी मोठा खर्च केला होता. पुराच्या तडाख्यात प्रकल्पातील पन्नास टक्के गांडुळे पाण्याबरोबर वाहून गेली आहेत. त्यामुळे पवार यांनी यासाठी केलेला मोठा खर्च वाया गेला आहे. सागावात पुरामुळे घरे, शेती, व्यवसाय, उद्योगधंद्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सर्वांना आता शासनस्तरावरुन मिळणाऱ्या मदतीची प्रतीक्षा आहे.