विटा नगरपरिषदेने शहरातील दुकाने उघडण्यापूर्वी सर्व व्यापारी व त्यांच्या कामगारांची पहिल्यांदा कोरोना चाचणी घेण्याची मोहीम सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : गेल्या महिनाभराच्या कडक निर्बंधानंतर प्रशासनाने व्यवसाय सुरू करण्यास शिथिलता दिल्याने विटा शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नगरपालिका प्रशासनाने, व्यापाऱ्यांनी प्रथम कोरोना चाचणी करूनच मग व्यवसाय सुरू करण्याचा आदेश देत, व्यापाऱ्यांची चाचणी घेण्याची मोेहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील सुमारे ३६० व्यापारी व तेथील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेतल्यानंतर त्यातील २ जणांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.
विटा शहरात निर्बंध शिथिल केल्यानंतर दुकाने, व्यापारी बाजारपेठ, भाजी मंडई यांसह अन्य दुकाने सुरू झाली आहेत. मात्र, शासनाने निर्बंध शिथिल केले असले तरी पहिल्यांदा व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी घेऊनच दुकाने उघडण्याची मोहीम हाती घेतली. त्यानुसार नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने भाजी मंडईतील १०८ व्यापाऱ्यांची चाचणी घेतली. त्यात एक पॉझिटिव्ह आला. त्यानंतर व्यापारी संकुलातील १२४ व्यापाऱ्यांच्या घेतलेल्या चाचणीत सर्वजण निगेटिव्ह आले. तसेच १२८ शेतकरी व्यापाऱ्यांची चाचणी घेण्यात आली, त्यातही एक पॉझिटिव्ह सापडला आहे.
विटा नगरपरिषद प्रशासनाने आतापर्यंत ३६० व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी घेतली असून उर्वरितांची चाचणी घेण्याची मोहीम सुरूच ठेवली आहे. व्यापारी व त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी केले आहे.
या मोहिमेत ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. दीपाली गायकवाड, डॉ. अभिजित निकम, डॉ. नीलम मणेर, डॉ. वृषाली कुलकर्णी, व्ही. डी. पवार, विनायक जोशी, अझर मुल्ला, नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक आनंदा सावंत, सलीम शेख सहभागी झाले होते.