मागील दोन वर्षांत सरासरीपेक्षा पाऊस जास्त पडत असल्याने शेतकऱ्यांची शेतीच्या पाण्याची चिंता मिटली असून, कारखाने तीन हजारापेक्षा जादा दर देत असल्याने ऊस हुकमी पीक ठरले आहे.
बहुतांशी शेतकरी पाण्याच्या सोईनुसार ऊस पीक घेण्याकडे लक्ष देत आहेत.
काही शेतकरी उसाचे तयार केलेले नर्सरीमधील रोप लावत आहेत, तर काही शेतकरी ८६०३२ या उसाचे बियाणे लावण्यासाठी पसंत करीत आहेत. चौदा ते पंधरा महिन्यांनंतर कारखान्यास ऊस घालवून शेतकरी गुंठ्याला दीड टनापासून ते तीन टनापर्यंत उत्पन्न घेत आहेत, तर काही शेतकरी ऊस लावण्यासाठी गुंठ्यावर चार हजार रुपयांपासून ते सात हजार रुपयांपर्यंत विक्री करीत आहेत. बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे.
चांगल्या ऊस बियाण्याची निवड करून लावणी करीत असल्याचे दौलत पाटील, जितेंद्र जाधव, श्रीकांत आढाव (सर्व कामेरी) या प्रगतशील शेतकऱ्यांनी सांगितले.
कोट
शेतात उत्तम प्रतीचे ८६०३२ हे बियाणे घेऊन उसाला वेळेवर खत लागवड देऊन नऊ ते दहा महिन्यांत चांगली वाढ झाली. शेतातील २० गुंठे क्षेत्रात उसाचे बियाणांसाठी विक्री करून एक लाख चाळीस हजार रुपये मिळाले.
- वसंतराव यादव, माजी सैनिक, येडेनिपाणी.