नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथे गटारीचे पाणी शेतात येत असल्याने नुकसान होत आहे. याबाबत संबंधितांना वारंवार सांगूनही दुर्लक्ष केले जात आहे. आठ दिवसांत याबाबत निर्णय न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा शेतकरी दिलीप विलास माने यांनी दिला आहे. याबाबत प्रशासनाला निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नेर्ले गावालगत सर्व्हे नंबर ६२६ मध्ये माझी शेतजमीन आहे. या शेतात गावातील गटारीचे पाणी साठत आहे. त्यामुळे शेतजमिनीचे व पिकांचे नुकसान होत आहे. याबाबत तक्रार करूनही दुर्लक्ष होत आहे. गटारीचे पाणी ग्रामपंचायतीने प्रवाही करून माझे नुकसान टाळावे. आठ दिवसांत कार्यवाही व्हावी अन्यथा उपोषणास बसावे लागेल.
निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, सरपंच यांना दिली आहे.