लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : खासदार संजयकाका पाटील यांच्या नागेवाडी (ता. खानापूर) येथील यशवंत कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाचे बिल अद्यापही न दिल्याने ‘यशवंत’ विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. थकीत ऊस बिले तातडीने द्यावीत, अन्यथा विटा तहसील कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदार ऋषिकेत शेळके यांना दिला.
यशवंत साखर कारखान्याने जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात ऊस गाळप केलेल्या शेतकऱ्यांचे ऊस बिल अद्यापही दिले नाही. एप्रिल महिन्यात यशवंत कारखाना कार्यस्थळावर शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी खा. संजयकाका पाटील व कार्यकारी संचालक आर. डी. पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होऊन एप्रिल महिनाअखेर उसाची थकीत रक्कम शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यावर वर्ग करण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, अजूनही उसाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपूर्वी तासगाव कारखाना कार्यस्थळावर शेतकऱ्यांनी खा. पाटील यांची भेट घेऊन रक्कम देण्याची मागणी केली. त्यावेळी खा. पाटील यांनी दि. ७ जूनपर्यंत शेतकऱ्यांना सर्व थकीत रक्कम देण्याचे पुन्हा आश्वासन दिले.
उसाची रक्कम दिली गेली नसल्याने शेतकऱ्यांनी दि. ७ रोजी तासगाव येथे आंदोलन केले. त्यावेळी कार्यकारी संचालक आर. डी. पाटील यांनी दि. ११ जून रोजी पैसे देत असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी खा. पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही तातडीने शेतकऱ्यांना पैसे देण्याचा शब्द दिला आहे. नागेवाडीच्या यशवंत कारखाना व्यवस्थापनाकडून शेतकऱ्यांना केवळ आश्वासने दिली जात आहेत. त्यामुळे आता ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून विट्याचे तहसीलदार ऋषिकेत शेळके यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
यावेळी शिवाजी भोसले, प्रकाश शितोळे, सिद्धू जाधव, सुनील पवार, सयाजी शिंदे, अर्जुन होगले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.