कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तासगाव शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दरदिवशी तालुक्यातून १००पेक्षा जास्त रुग्ण कोरोनाबाधित होत असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी आणि कोरोना साखळी तोडण्यासाठी आता पदाधिकारी आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वैद्यकीय अत्यावश्यक सेवावगळता किराणा मालाची दुकाने, बेकरी यासह सर्व सेवा कडकडीत बंद करण्यात येणार आहेत. सावळज, राजापूर, जरंडी यासह अन्य गावांमध्ये जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे.
शुक्रवारी तासगाव नगरपालिकेत सर्वपक्षीय पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत २ मेपासून दहा दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला. यावेळी सकाळी एक तासातच दूध पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच भाजीपाला विक्रीही एका जागेला बसून न करता घरपोच देण्याचा निर्णय घेण्यात आला. वैद्यकीय अत्यावश्यक सेवावगळता इतर सर्व सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. वैद्यकीय सेवेत अतिरिक्त रस्त्यावर नागरिक फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय झाला.