लोकमत न्यूज नेटवर्क
तांदूळवाडी : एक महिना होऊनही वारणा नदीकाठावरील पडलेल्या विजेच्या खांबांची आणि तारांची दुरुस्ती न केल्याने विद्युतपुरवठ्याअभावी वाळणाऱ्या पिकांकडे बघत शेतकरी चिंताक्रांत झाला आहे. पर्याय म्हणून डिझेल इंंजिनचा वापर करत पाणी देऊन पिकांना जीवदान देण्याची धडपड सुरू आहे. परंतु, डिझेलचे दर न परवडणारे असल्याने भुर्दंड बसत आहे.
कुंडलवाडी (ता. वाळवा) या गावाला कुरळप येथील उपकेंद्रातून विद्युतपुरवठा केला जात आहे. जुलै महिन्यात वारणा नदीला महापूर आल्याने नदीकाठावरील विजेचे खांब आणि तारा यांचे नुकसान झाले. पूर ओसरून महिना झाला तरी पडलेले खांब आणि वीजतारांची दुरुस्ती न झाल्याने शेतातील पिके वीजपुरवठ्याअभावी पाणी देता न आल्याने करपू लागली आहेत. यामध्ये अल्पभूधारक शेतकरी होरपळून निघत आहे. ज्यांची परिस्थिती चांगली आहे, त्यांनी डिझेल इंजिन बसवले आहे. पण, डिझेलचे दर न परवडणारे असल्याने भुर्दंड बसत आहे.