मोहन मोहिते - वांगी -वांगी येथील एसटी बसस्थानक परिसरात यल्लम्मा मंदिराजवळ गेल्या ४० वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या जागेवर असणारे अतिक्रमण काढण्यापूर्वीच ती जागा संबंधित अतिक्रमण करणाऱ्यांच्या घशात घालण्याचा अजब प्रकार वांगी ग्रामपंचायतीच्या प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ही जागा मोफत वापरून ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान करणाऱ्या अतिक्रमण धारकांवर वांगी ग्रामपंचायत एवढी मेहेरबान का झाली?, असा सवाल विचारला जात आहे.वांगी (ता. कडेगाव) येथे यल्लम्मा मंदिर परिसरात गेल्या ४० वर्षांपासून स्थानिक नागरिकांनी अतिक्रमण करून त्या ठिकाणी छोटे-मोठे व्यवसाय उभारले आहेत. मात्र ४० वर्षात भाडे म्हणून काहीही रक्कम ग्रामपंचायतीला दिलेली नाही. मागील वर्षापासून ग्रामपंचायतीने गावातील शासकीय सर्व जागांवरील अतिक्रमणे हटवून, अतिक्रमणमुक्त वांगी करण्याचा ध्यास घेतला होता. त्याचीच सुरूवात म्हणून गावातील मुख्य बाजार कट्ट्यावर असणारी १५ ते २० खोकी काढून ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटाव मोहिमेचा श्रीगणेशा केला होता. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या जागेत असणारे अतिक्रमण काढण्यात आले. त्याचबरोबर न्यायालयीन लढाई करून महाराष्ट्र शासनाच्या जागेवर असणारे ८ ते १० खोक्यांचे अतिक्रमण काढण्यात ग्रामपंचायतीला यश आले. ही अतिक्रमण हटाव मोहीम यशस्वीपणे राबविली जात असल्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे कौतुक केले. त्यानंतर ग्रामपंचायतीने एसटी बसस्थानकाच्या पाठीमागील हायस्कूल रस्त्यावरील १० ते १२ अतिक्रमणे काढली. ही सर्व अतिक्रमणे ग्रामपंचायतीने दोन दिवसांची मुदत देऊन काढली आहेत. मात्र येथील यल्लम्मा मंदिर परिसरात असणारी अतिक्रमणे काढण्याची मोहीम गेल्या महिन्यापासून सुरू असूनही, अद्याप येथील अतिक्रमणे पूर्णत: निघालेली नाहीत. याउलट ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासनाने या अतिक्रमण धारकांबरोबर संगनमत केले आहे. येथे रिकाम्या होणाऱ्या जागेवर गाळे बांधून ते गाळे पूर्वीपासून अतिक्रमण करणाऱ्या लोकांना देण्यासाठी वांगी ग्रामपंचायतीकडून ५० हजार रूपये भरून घेतले आहेत. गेल्या चाळीस वर्षांपासून ग्रामपंचायतीची जागा मोफत वापरणाऱ्यांवर ग्रामपंचायत एवढी मेहेरबान का झाली आहे?, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.वांगीत अतिक्रमण केलेल्या जागेवर गाळे बांधून त्यांचा जाहीर लिलाव केला, तर ग्रामपंचायतीला मोठा फायदा होणार असताना, केवळ ५० हजार रूपयांत ही जागा अतिक्रमण करणाऱ्यांच्या घशात घालण्यात कोणाचे कोणते हितसंबंध गुंतले आहेत, याचा तपास होणे गरजेचे आहे. गावातील अतिक्रमणे काढताना ३० ते ३५ व्यावसायिक रस्त्यावर आले असताना, ग्रामपंचायत याच लोकांवर मेहेरबान का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
अतिक्रमण काढण्यापूर्वीच जागा खोकीधारकांच्या घशात
By admin | Updated: May 27, 2015 01:02 IST