ओळ : तासगाव येथे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना महेश खराडे, गुलाब यादव, सचिन पाटील, दामाजी डुबल यांनी निवेदन दिले.
तासगाव : वीजबिलाच्या थकबाकीपोटी तोडण्यात आलेली शेतकऱ्यांची वीज पुन्हा जोडावी. तसेच वीजतोडणीची कारवाई त्वरित थांबविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी महावितरणला निवेदन दिले. यानंतर पुढील आठ दिवसांसाठी कारवाई थांबविण्याचे तसेच आतापर्यंत तोडलेली वीज कनेक्शन जोडण्याचे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले. आठ दिवसांत थकबाकी न भरल्यास पुन्हा कारवाईचा इशारा उपकार्यकारी अभियंता सिकंदर मुल्ला आणि भारत व्हनमाने यांनी दिला.
थकबाकीदार शेतकऱ्यांच्या ट्रान्सफॉर्मरचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई तासगाव तालुक्यात सुरू झाली आहे. तासगाव, धुळगाव, मतकुणकी, मांजर्डे, आरवडे, सावळज, वायफळे यांसह अनेक गावांत ट्रान्स्फॉर्मरचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. बुधवारी महावितरणच्या कारवाईचा निषेध करीत ‘स्वाभिमानी’ने बुधवारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाध्यक्ष महेश खराडे, तालुकाध्यक्ष अध्यक्ष दामाजी दुबल, युवा आघाडीचे अध्यक्ष सचिन पाटील, कार्याध्यक्ष गुलाबराव यादव, संदीप शिरोटे, शिवाजी पाटील, सूरज पाटील, पोपट उपाध्ये, आशिष पाटील, समीर तांबोळी, वसंत उपाध्ये, कुमार माळी, अमोल गव्हाणकर, मोहन पाटील, चंद्रकांत शिंदे, आदींसह शेतकरी तासगाव येथील महावितरण कार्यालयात जमले. महेश खराडे यांनी उपकार्यकारी अभियंता भारत व्हनमाने आणि सिकंदर मुल्ला यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी सांगितल्या. आतापर्यंत तोडलेली कनेक्शन जोडा अशी मागणी केली. वीज बिल भरण्यासाठी आठ दिवसांची मुदत द्या, तसेच टप्पे पाडून द्या, अशी भूमिका मांडली. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कारवाईला आठ दिवसांचा ब्रेक देण्याचे आश्वासन दिले. तोडलेली सर्व कनेक्शन तातडीने जोडण्याची ग्वाही दिली.