सांगली : सर्वसामान्यांच्या बजेटला धक्का देत महागाईच्या आगीत तेल ओतणाऱ्या खाद्यतेलाच्या दरांत आता घसरण हाेत आहे. गेल्या काही दिवसांत तेलांच्या दरात १२ ते १५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. त्यामुळे स्वयंपाक घरात सुरू असलेली खाद्यतेलाची काटकसरही थांबण्याची चिन्हे आहेत.
गेल्या चार दिवसांत खाद्यतेलांच्या किमतीत १५ टक्के कमी आली आहे. अमेरिकेत पुन्हा एकदा बायो फ्यूलमध्ये इतर खाद्यतेल मिसळण्याचे प्रमाण वाढवले जाणार आहे. यात ४६ टक्के रिफाइंड ऑइल मिसळण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मलेशिया आणि इंडोनेशियामध्येही तेल उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे याचा परिणाम भारतीय बाजारात पाहायला मिळत आहे. या सर्वांचा पामतेलाच्या दरावर सकारात्मक परिणाम दिसत आहे. दुसरीकडे गुजराती शेंगदाण्यासह अन्य राज्यांमधून शेंगदाणा मोठ्या प्रमाणावर येत असल्याने शेंगतेलाचे भावही गतीने खाली येत आहेत.
भारत हा खाद्यतेलाचा जगातील आघाडीचा खरेदीदार आहे. देशातील एकूण खाद्यतेलांत ७० टक्के खाद्यतेल हे आयात केलेले असते. ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या काळात भारताने एकूण १ कोटी ३२ लाख ८२ हजार ४२७ टन खाद्यतेल आयात केले होते.
चौकट
शेंगदाणा, सूर्यफुलांचे उत्पादन घटले
तेल उत्पादकांच्या मते जिल्ह्यातील शेंगदाणा, सूर्यफुलांचे उत्पादन गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर घटले आहे. कच्च्या मालाची उपलब्धता होत नसल्याने तेल उद्योगही बंद पडत आहेत. या उत्पादनांना प्रोत्साहन दिल्यास तेलांचे दर नियंत्रणात येऊ शकतात.
खाद्यतेलांचे किरकोळ बाजारातील भाव रुपये
तेल पूर्वी आता
शेंगतेल १९० १६८
पाम १४० १२५
सूर्यफूल १८५ १७८
सरकी १७० १५०
मोहरी १९० १७०
कोट
एकरी उत्पादकता कमी असल्यामुळे पूर्वीसारखे शेंग व सूर्यफूल उत्पादन घेतले जात नाही. पूर्वी हा शेतीमाल उत्पादित करून घाण्यावर तेल काढून वर्षभर कुटुंबाला पुरेल इतके तेल शेतकऱ्याला मिळत होते. आता शेतकरी तेल विकत घेत आहे. त्यामुळे उत्पादकता वाढविण्यासाठी शासनाने बियाणे संशोधनाला वाव द्यावा.
- महेश खराडे, शेतकरी
कोट
वास्तविक आता घाणे परत येत आहेत. केवळ तेलासाठी आवश्यक शेतीमाल उत्पादित करताना शेतकऱ्याचा फायदा होण्याच्या दृष्टीने बियाणे संशोधन करावे. त्यातून उत्पादन वाढून खाद्यतेलाचे दर नियंत्रित राहतील. घाण्यावरील तेल उत्पादनालाही प्रोत्साहन मिळायला हवे, ते आरोग्यदायी आहे.
- बाळासाहेब यादव, शेतकरी, येळावी