लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : देशातील असंघटित कामगारांसाठी केंद्र सरकारने ई-श्रम कार्ड योजना जाहीर केली आहे. महाराष्ट्रात असंघटित कामगारांची नोंदणी आणि ई-श्रम कार्ड योजना सर्व कामगारांपर्यंत पोहोचवण्याचे काम लोकशक्ती असंघटित कामगार संघटना व आरोही फौंडेशनतर्फे राज्यभरात करणार आहे, अशी माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अधिकराव जगताप यांनी दिली.
अधिकराव जगताप म्हणाले, देशात आजपर्यंत असंघटित कामगारांची गणना झालेली नाही. त्यांची नेमकी संख्या किती, याची नोंद सरकारकडे नाही. मोठा कामगार वर्ग आजपर्यंत सरकारी योजनांपासून वंचित राहिला आहे. या कामगारांची नोंदणी करून त्यांना सरकारी योजनेचा लाभ मिळावा आणि समस्यांचे निराकरण व्हावे, यासाठी केंद्र सरकारने नुकतीच ई-श्रम कार्ड ही योजना संपूर्ण देशात राबविण्याचे जाहीर केले आहे. या योजनेचे अनेक लाभ व फायदे कामगारांना मिळणार आहेत. स्वयंरोजगारासाठी वित्तसहाय्य, मुलांच्या शिक्षणासाठी अर्थसहाय्य, सुरक्षा विमा यासारख्या विविध गोष्टींचा लाभ या योजनेच्या माध्यमातून श्रमजीवी कामगारांना मिळणार आहे. महाराष्ट्रात सर्व क्षेत्रातील असंघटित कामगारांना ई-श्रम कार्ड योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. एकही श्रमजीवी या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी राज्यभर कामगारांची नोंदणी आणि मार्गदर्शन अभियान लोकशक्ती असंघटित कामगार संघटना आणि आरोही फाैंडेशनच्या माध्यमातून राबविणार आहे.