लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांत पुरेशा संख्येने एमबीबीएस डाॅक्टर्स असले तरी अनेकजण प्रशासकीय कामकाजात बुडून गेले आहेत. प्रत्यक्ष आरोग्यसेवेसाठी डॉक्टर मिळत नसल्याचे चित्र आहे. या स्थितीत बीएएमएस डॉक्टरांची कंत्राटी भरती करून रुग्णसेवा अखंडित ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांत एमबीबीएस डॉक्टरांची १२८ पदे आहेत, त्यापैकी १२३ पदांवर डॉक्टर कार्यरत आहेत. पाच जागा रिक्त आहेत. अर्थात, रिक्त पदांचा प्रश्न फार गंभीर नाही. पण उपलब्ध डॉक्टरांना रुग्णसेवेऐवजी अन्य प्रशासकीय कामांसाठीच जुंपले जात आहे. कोरोनाकाळात ही समस्या प्रकर्षाने जाणवली. जिल्हा परिषद, जिल्हा शल्यचिकित्सक व महापालिकनेे वारंवार जाहिराती काढल्या, तरीही एमबीबीएस डॉक्टर्स मिळाले नाहीत. जिल्हाधिकारी कार्यालयाला २५, महापालिकेला ५ व जिल्हा परिषदेला फक्त १० एमबीबीएस डॉक्टर्स मिळाले. रिक्त जागांवर बीएएमएस डॉक्टर नियुक्त करून रुग्णसेवा अखंडित ठेवावी लागली.
एमबीबीएस डॉक्टरांच्या रिक्त जागांची समस्या ग्रामिण भागातील गंभीर स्वरूपाची ठरली आहे. विशेषत: जत, आटपाडीसारख्या दूरच्या तालुक्यांत कामासाठी डॉक्टर तयार होत नसल्याचा प्रशासनाचा अनुभव आहे.
बॉक्स
पाच रिक्त जागा
जिल्हाभरातील ६२ प्राथमिक आरोग्य केंद्रांत एमबीबीएस डॉक्टरांच्या १२८ जागा आहेत, त्यापैकी पाच जागा रिक्त आहेत. त्याठिकाणी बीएएमएस डॉक्टर्स भरून रुग्णसेवा सुरू ठेवली जात आहे. उर्वरित ठिकाणी डॉक्टर्स असले तरी प्रत्यक्ष रुग्णसेवेसाठी सगळेच उपलब्ध नसतात. कोरोना काळात प्रशासकीय कामकाजात अनेकजण अडकून पडत आहेत. पंचायत समितीच्या बैठका, तालुकास्तरीय वैद्यकीय आढावा बैठका, ग्रामदक्षता समित्यांच्या बैठका, वेगवेगळी सर्वेक्षणे, लसीकरणाचे नियोजन यातच डॉक्टर्स अडकले आहेत.
बॉक्स
खेडेगावात ड्युटी नको रे बाबा !
- बहुतांश डॉक्टरांचा कल शहरी भागातील सेवेकडे आहे. ग्रामीण भागात ड्युटी नको रे बाबा अशीच त्यांची भूमिका दिसते.
- दूरचा प्रवास, रात्री-अपरात्री रुग्णांचे येणे, चांगल्या राहणीमानासाठी सोयीसुविधांचा अभाव आदी कारणांनी खेडेगावात ड्युटीला डॉक्टर नाके मुरडतात.
- आरोग्य केंद्रात रुग्णसेवेसाठी अनेक प्राथमिक सुविधांचीही वाणवा असते. गंभीरप्रसंगी रुग्ण दगावण्याचा धोका असतो. त्यामुळेही शहरातील सोप्या ड्युटीकडे डॉक्टरांचा कल आहे.
ग्राफ
कोरोनाकाळातील एकूण नियुक्त्या ४०
शहरी भागातील नियुक्त्या ५
हजर झाले ५
ग्रामीण भागातील नियुक्त्या ४५
हजर झाले ३५
कोट
दूरचा प्रवास आणि सोयी-सुविधांचा अभाव
शहरापासून ४० किलोमीटरचा प्रवास करून ड्युटीवर जावे लागते. दिवसभराच्या कामानंतर पुन्हा लांबचा प्रवास करून घरी येतो. यामुळे प्रचंड दमछाक होते. स्वत:साठी वेळ देता येत नाही. ग्रामीण भागात रुग्णवाहिका, सुसज्ज शस्त्रक्रियागृह, तज्ज्ञ मदतनीस, अैाषधांचा पुरेसा साठा याबाबतीतही सतत संघर्ष करावा लागतो. त्यामुळेही ग्रामीण भागातील ड्युटी जोखमीची व कंटाळवाणी ठरते.
- एक डॉक्टर
ग्रामिण भागात आरोग्यसेवेतील राजकीय हस्तक्षेप त्रासदायक ठरतो. लसीसाठी दबाव, रुग्ण दगावल्यास नातेवाइकांकडून होणारा त्रास अशा प्रसंगांना तोंड द्यावे लागते. गंभीर प्रसंगी मार्गदर्शनासाठी वरिष्ठ डॉक्टरही उपलब्ध नसतात. शिवाय स्वत:च्या कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नाही. त्यामुळेही गावाकडील ड्युटीकडे अनेकजण पाठ फिरवतात.
- एक डॉक्टर
खेडेगावातील गैरसोयींमुळे डॉक्टर ड्युटीसाठी नाखुश असतात. शहरापासून लांबचा प्रवास हेदेखील महत्त्वाचे कारण आहे. शहरी सुखसोयींची सवय झालेले डॉक्टर्स गावातील दूर अंतरावरील ड्युटीकडे पाठ फिरवतात. तरीही कोरोनाकाळात अनेक चांगले डॉक्टर शासकीय सेेवेत आले आहेत.
- डॉ. विनायक पाटील, समन्वयक, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान