वाळवा : महापूर ओसरू लागल्यानंतर मंगळवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी वाळवा येथे भेट देऊन ग्रामपंचायतीतर्फे सुरू असलेल्या स्वच्छता व औषध फवारणीची पाहणी केली. वाळवा येथील कोटभाग, हाळभाग, पेठभाग, दत्तनगर, महादेवनगर, नेमिनाथनगर, लक्ष्मीनगर, जुनेखेड मार्गावरील वस्ती, नागठाणे रस्ता वस्ती, आष्टा जुना रस्ता येथील वस्त्या, महात्मा फुलेनगर येथे महापुराचे पाणी आले होते. गटारी गाळाने बुजलेल्या आहेत. मृत प्राण्यांचे अवशेष पाण्यावर तरंगत आहेत. त्यांची साफसफाई ग्रामपंचायतीने सुरू केली आहे.
गटारीतील गाळ काढून त्या वाहत्या केल्या जात आहेत. रस्त्यावर पडलेला गाळ जेसीबी साहाय्याने काढला जात आहे. याची पाहणी डुडी यांनी केली. त्यांच्यासमवेत गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, सरपंच डॉ. शुभांगी माळी, उपसरपंच पोपट अहिर, ग्रामविकास अधिकारी मधुकर हाताळे व सदस्य होते.