सांगली : जिल्हा बँकेतील काही गोष्टींबाबत काहींनी शंका उपस्थित केल्या आहेत. त्यांच्या शंका लवकरात लवकर दूर करण्याचा प्रयत्न राहील. त्यासाठी चौकशी होणे आवश्यक आहे. चौकशीत फारसे काही निष्पन्न होईल, असे वाटत नाही. तरीही ज्यांनी शंका घेतली आहे त्यांची दखल घेऊन चौकशी केली जाईल, असे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
ते म्हणाले की, सहकार टिकला पाहिजे. तो टिकविण्याच्या दृष्टीनेच प्रयत्न झाले पाहिजेत. सहकारी संस्था चालविताना अनेक अडचणी येतील. यासाठी आम्ही सर्वपक्षीय लोकांना संचालक मंडळात घेत असतो. जिल्ह्यातील बंद सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या व अन्य संस्था कशा पद्धतीने पुन्हा सुरू करता येतील, यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना जिल्हा बँकेच्या संचालकांना दिली आहे.
चौकट
राष्ट्रवादीला टार्गेट करण्याचा प्रकार
जयंत पाटील म्हणाले की, किरीट सोमय्यांकडून हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या आरोपात तथ्य नाही. आरोप करून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना टार्गेट करण्याचे षड्यंत्र राज्यात सुरू आहे. ही पद्धत अत्यंत चुकीची आहे. एखाद्या चौकशी संस्थेने काही प्रश्न उपस्थित केले, तर गोष्ट वेगळी आहे. मात्र, अकारण भाजप नेते कोणतेही आरोप करीत सुटले आहेत.