सांगली : जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णसंख्या घटत ती दोनशेच्या आतमध्ये आल्याने दिलासा मिळाला असतानाच, पॉझिटिव्हिटी रेटही चांगलाच घटला आहे. जिल्ह्यातील ‘ॲक्टिव्ह’ रुग्णांची संख्याही प्रथमच हजाराच्या आत आल्याने पुन्हा कोरोनापासून बचावाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. पॉझिटिव्हिटी रेट दोन टक्क्यांवर आल्याने अनेकांकडून मास्कचा वापर कमी झाला आहे. परिणामी कोरोनापासून बचावासाठी आवश्यक असलेले मास्क, सॅनिटायझरची मागणी घटली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या दोन हजारांवर गेली होती. राज्याच्या अनेक भागांत सध्या कमी रुग्ण आढळून येत असताना, जिल्ह्यात रोज शंभरावर रुग्ण आढळून येत आहेत तर सरासरी दहा जणांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे अद्यापही कोरोना संसर्ग कायम असल्याचेच चित्र आहे.
शासनाकडून कोरोनाविषयक निर्बंध हटविल्याने बाजारपेठेतील गर्दी वाढत आहे तर सोशल डिस्टन्सिंगचा वापर नावालाच होत आहे. तरीही शासनाकडून तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात असली तरी सध्या तरी पुन्हा रुग्णसंख्या वाढण्याची कोणतीही शक्यता वाटत नाही.
जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वी पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांवर कायम होता. आता हा कमी होत अवघ्या २ टक्क्यांवर आला आहे. जिल्हा प्रशासनाने आरटीपीसीआर व रॅपिड ॲन्टिजनच्या चाचण्यांचे प्रमाण कायम ठेवले असतानाही रूग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण कमी होत आहे.
कमी होत चाललेली रुग्णसंख्या आणि हटविण्यात आलेले निर्बंध यामुळे अनेकांनी आता कोरोना गेलाच या भावनेने मास्कचा वापर बंद केला आहे. जिल्ह्यात अद्यापही रुग्णसंख्या कायम असल्याने कोरोनापासून बचावासासाठी नियमांचे पालन करणे आवश्यकच असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.
कोट
जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी झाली असली तरी कोरोना गेला या भावनेने कोणी राहू नये. अद्यापही रुग्ण आढळत असल्याने नियमित मास्कचा वापर करावा, गर्दीत जाताना विशेष खबरदारी घ्यावी.
डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक
कोट
गेल्या महिनाभरापासूनच मास्कची मागणी घटली आहे. यापूर्वी सर्जिकल मास्कला अधिक मागणी होती. आता सॅनिटायझरची थोडीफार मागणी कायम आहे तर मास्कला मात्र मागणी नाही.
किरण माने, औषध दुकानदार