सांगली : जिल्ह्याच्या किमान व कमाल तापमानात गेल्या दोन दिवसांत घट होत असून पारा आता सरासरीच्या जवळ आला आहे. येत्या चार दिवसांत तापमानात अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे.
शनिवारी जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान ३६ तर किमान तापमान १७ अंंश सेल्सिअस नोंदले गेले. काही दिवसांपूर्वी कमाल तापमान ३९ अंशावर तर किमान तापमान २२ अंशापर्यंत वाढले होते. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना उकाडा असह्य झाला होता. उकाडा आता कमी होत आहे. तापमानात घट होऊन सरासरीच्या जवळ आले आहे. त्यामुळे वातावरणातील उकाडा बऱ्याचअंशी कमी झाला आहे. हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार येत्या चार दिवसांत कमाल तापमानात अंशाने वाढ होऊन तापमान ३७ अंशांवर तर किमान तापमानात अंशाने घट होऊन ते १६ अंशांपर्यंत येणार आहे. त्यामुळे रात्रीचा उकाडा फारसा जाणवणार नाही.
आठवडाभर आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
यंदा उन्हाळ्याला उशिरा सुरुवात झाली आहे. हवामानातील सतत होणारे बदल नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करणारे ठरत आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते नागरिकांना बदलत्या हवामानात आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.