सांगली : परवानगीशिवाय खासगी बोटींना नदीपात्रात फिरण्यास महापालिका आयुक्तांनी बंदी घातल्यानंतर शहरातील बाेट क्लब व विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीसाठी मंडळांना परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
विसावा मंडळाचे अध्यक्ष संजय चव्हाण म्हणाले की, महापुराच्या काळात शहरातील बोट क्लब, जलतरण संस्था व विविध मंडळांचे कार्यकर्ते प्रशासनाला मदत करीत असतात. येथील अनेक मंडळांचा आपत्ती व्यवस्थापनातील योगदानाबद्दल शासनाने गौरवही केला आहे. दरवर्षी पावसाळ्यात बोटी पाण्यात उतरवून आपत्ती व्यवस्थापनाचा सराव करावा लागतो. सराव न करता आपत्तीचे व्यवस्थापन करणार तरी कसे, त्यामुळे हा सराव महत्त्वाचा असतो. कोणतीही मंडळे अकारण नदीत बोटी आणत नाहीत.
महापालिकेने अचानकपणे परवानगीशिवाय नदीत बोटी आणण्यास केलेला मज्जाव चुकीचा आहे. अशामुळे आपत्ती व्यवस्थापनातील मंडळांच्या सहभागाला अडचणी येतील. मंडळांचे महापुरातील योगदान अत्यंत महत्त्वाचे असते. कर्तव्यभावनेने ते हे काम करीत असतात. त्यामुळे त्यांना आपत्ती व्यवस्थापनाचा सराव करण्यास अडचण करू नये. त्यांना मोकळीक द्यावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.
चौकट
स्वखर्चाने करतात मदत
आपत्ती व्यवस्थापनात मदत करणारी मंडळे स्वखर्चाने यात उतरत असतात. शासनाकडून कोणत्याही मदतीच्या अपेक्षेविना गेल्या काही वर्षांपासून ते याकामी मदत करीत आहेत, असे चव्हाण म्हणाले.