कवलापुरात गावपातळीवर यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीप्रणित गटाच्या नेत्यांचेच प्राबल्य राहिले आहे. मात्र मागील जिल्हा परिषद निवडनुकीनंतर सगळेच संदर्भ बदलले आहेत. काँग्रेसचे नेते निवासबापू पाटील, माजी उपसरपंच विजय ऊर्फ बजरंग पाटील यांनी राजकीय अपरिहार्यतेतून भाजपात प्रवेश केला आहे. दुसरीकडे आमदार खाडेंच्या प्रचारात असणारे तंटामुक्ती समिती अध्यक्ष भानुदास पाटील यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे. हीपण एक राजकीय अपरिहार्यताच आहे.
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याणचे माजी सभापती सदाशिव खाडे सध्या राष्ट्रवादीत असून, महाविकास आघाडीप्रणित पॅनेलच्या प्रचारात उतरले आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाची पोकळी भरून काढण्याचे काम जिल्हा विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष सौरभ पाटील या नव्या दमाच्या सुशिक्षित युवकाने इर्षेने हाती घेतले आहे.
चौकट
इतिहासात प्रथमच
कवलापूर ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच वॉर्ड क्र. ६ च्या तीनही जागा बिनविरोध निवडून आल्या. मायाक्का मंदिर समितीचे अध्यक्ष उत्तमराव हिंदुराव पाटील यांनी ही किमया केली. अर्थात त्यांचे सर्वांशीच असलेले स्नेहबंध याकामी उपयोगी पडले. शरद शिवाजी पवळ, मनीषा शंकर पाटील, सुषमा शरद पाटील या तिघांची बिनविरोध निवड झाली आहे.