लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : धनगर समाजासाठी एस. टी. आरक्षण अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्यावतीने राज्यभर लढा उभारणार आहे. सरकार कोणतेही असो धनगर समाजाच्या दृष्टीने आरक्षण लागू होणे ही आज काळाची गरज बनली आहे. राज्य अथवा केंद्र सरकार आरक्षण प्रश्नांवर वेळकाढूपणाची भूमिका घेत आहे असा आरोप महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. राजेंद्र डांगे यांनी केला.
धनगर समाज महासंघाच्या वतीने विभागीय बैठकांचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.
ॲड. राजेंद्र डांगे म्हणाले की, आरक्षणाच्या प्रश्नांवर यापुढे धनगर समाजाला सरकारसोबत आरपारची लढाई करावी लागेल. आरक्षण हे ओबीसीच्या विकासाचे मुख्य माध्यम आहे. महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला ३० टक्के आरक्षण हे नोकरी, शिक्षणाप्रमाणेच राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे. केंद्र सरकारने जनगणनेच्या वेळी जातनिहाय जनगणना करावी. आगागी काळामध्ये आरक्षण प्रश्नासाठी महासंघाच्या माध्यमातुन राज्यव्यापी लढा उभारणार आहे.
या दौऱ्यामध्ये महासंघाचे प्रदेश सरचिटणीस सुनील वाघ, मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे, कर्मचारी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. अंकुशराव निर्मळ, सांस्कृतीक विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. अरूण घोडके, अहिल्या महिला संघाच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. अलकाताई गोडे सहभागी झाल्या होत्या.