लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : गावाचा विकास झाला तर तालुक्याचे नाव उंचावण्यात मदत होईल. यामुळे गावातील समस्या सोडवण्यासाठी, तसेच विकासकामे करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तालुक्यातील गावांच्या अडचणी, समस्यांवर मार्ग काढण्यासाठी मी सदैव तत्पर आहे, असे प्रतिपादन वाळवा पंचायत समितीचे गटनेते राहुल महाडीक यांनी केले.
ढवळी (ता. वाळवा) येथे मंजूर झालेल्या ५० लाख रुपयांच्या विकासकामांचा प्रारंभ महाडीक यांच्याहस्ते करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषद सदस्य निजाम मुलाणी, पंचायत समिती सदस्य मारुती खोत, ढवळीचे माजी सरपंच शरद पाटील, सरपंच पद्मावती माळी, उपसरपंच सचिन पाटील, बहादूरवाडीचे माजी सरपंच राजेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
जनसुविधा योजना अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे, २५/१५ योजनेअंतर्गत १४ व्या तसेच १५ वा वित्त आयोगातून ही विकासकामे मंजूर करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये पेविंग ब्लॉक बसवणे, रस्ता कॉंक्रिटीकरण, हायमास्ट दिवे, सांडपाणी व्यवस्था, जि. प .शाळेला एलईडी टीव्ही प्रदान करणे,नवीन स्मशानभूमी बांधणे अशा कामांचा प्रारंभ राहुल महाडीक यांच्या हस्ते करण्यात आला.