फोटो ओळी : अलकुड (ता. कवठेमहंकाळ) येथील एमआयडीसीबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना शेतकरी सेनेचे संदीप गिड्डे यांनी निवेदन दिले.
घाटनांद्रे : तासगाव-कवठेमहंकाळ तालुक्यात मोठे उद्योग निर्मित केंद्र नाही. त्यामुळे येथील तरुणांना उद्योगासाठी परजिल्ह्यात जावे लागते. यामुळे अलकुड (ता. कवठेमहंकाळ) येथील एमआयडीसी तत्काळ पूर्ण करावी, अशी मागणी शेतकरी सेनेचे नेते संदीप गिड्डे यांनी केली आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना याबाबत निवेदन दिले आहे.
संदीप गिड्डे म्हणाले की, तासगाव-कवठेमहंकाळ तालुक्यात मोठे उद्योग निर्मिती केंद्र नाही. त्यामुळे या भागाची प्रगती रखडली आहे. येथील युवकांना उद्योगाच्या शोधासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. याला आळा बसण्यासाठी व या भागाचा विकास होण्यासाठी सध्या ही एमआयडीसी होणे गरजेचे आहे. याला या भागात निर्माण होत असलेले राष्ट्रीय महामार्गाचे जाळे व रेल्वे सेवाही या एमआयडीसीला पूरक ठरणार आहे. त्यामुळे प्रलंबित असणाऱ्या अलकुड येथील एमआयडीसीचा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याची मागणी उद्योगमंत्र्यांकडे केली असल्याचे संदीप गिड्डे यांनी सांगितले.