सांगली: वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाई करत असताना महावितरण कंपनीने चुकीचे रीडिंग दाखवत असलेले वीज मीटर बदलून देण्याची गरज आहे. ग्राहकांनी वारंवार तक्रारी करूनही मीटर बदलले जात नाही. उलट चुकीची जादा वीजबिले देऊन ग्राहकांची फसवणूक केली जात आहे, असा वीज ग्राहकांचा आरोप आहे.
जुने वीज मीटर असल्यामुळे मीटर रीडिंग चुकीच्या पद्धतीने येत आहे. म्हणून बंद वीज मीटर बदलण्यासाठी अर्जही ग्राहकांनी दिले आहेत. तरीही महावितरण कंपनीने ते बदलून दिले नाहीत. कर्मचारी कमी असल्यामुळे ग्रामीण भागात ग्राहकांच्या तक्रारींची दखलही घेतली नाही. जिल्हास्तरावर मात्र सर्व काही आलबेल असल्याचे अधिकारी सांगत आहेत. बंद वीज मीटरमुळे ग्राहकांना चुकीची बिले मिळत आहेत. यामुळे ग्राहकही वीजबिल भरण्यास टाळाटाळ करीत आहेत. वीज ग्राहकांच्या या तक्रारीवर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तोडगा काढण्याची गरज आहे.