संख : संख (ता. जत) मध्यम प्रकल्पातून कलावा व बोर नदीला पाणी सोडावे, अशी मागणी बेळोंडगी सर्व सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष सोमनिंग बोरामणी यांनी केली आहे. याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पाटबंधारे कार्यालय यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की पूर्वभागातील संख मध्यम प्रकल्प यावर्षी भरलेला आहे. गेल्या २१ वर्षांत एकदाही कॅनॉलला पाणी सोडलेले नाही. १९९८ मध्ये पाणी सोडलेले होते. त्यानंतर एकदाही पाणी सोडलेले नाही. शेतकऱ्यांना पाण्याचा उपयोग व्हावा म्हणून शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून प्रकल्प व उमदीपर्यंत ३२ कि.मी. कालवा खोदला आहे.
पाणी सोडताना शेतकऱ्यांचे हित पाहून कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता कालव्यांद्वारे पाणी सोडल्यास करजगी, बेळाडगी, हळ्ळी, उमदी, सुसलाद, बालगाव, बोर्गी या गावाला फायदा होणार आहे.
शेतकऱ्यांना कालवा जमिनी अधिग्रहणाचे पैसे दिलेले आहेत. बोर नदीवर कोल्हापूर बंधारा बांधूनही करजगी, बोर्गी, हळ्ळी, बालगांव, सुसलाद येथील शेतकऱ्यांना उपयोग झालेला नाही.
त्यामुळे प्रकल्पातून पाणी सोडण्याचे पाटबंधारे विभागाला आदेश द्यावेत. अन्यथा शेतकऱ्यांसह संख अप्पर तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा सोमनिंग बोरामणी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.