संख : जत येथील महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (लघु क्षेत्र) वसाहतीमध्ये अनुसूचित जाती वर्गाच्या लोकांना तीन टक्के भूखंडाचे वाटप करावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने जत शहरालगत असलेल्या विजापूर-गुहागर या मार्गावर महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (लघु क्षेत्र ) उभारणी केली आहे.
औद्योगिक वसाहतीवर उद्योग भवनच्या जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांचे नियंत्रण आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये दुग्ध व्यवसाय, टायर रिमोल्डींग व्यवसाय, फरशी व्यवसाय, तेल रिफायंडरी, हाॅटेल आदी व्यवसाय सुरु आहेत.
तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुसूचित जाती वर्गाच्या लोकांना औद्योगिक वसाहतीमध्ये तीन टक्के भूखंडाचे वाटप करण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन महाविकास आघाडी सरकारने पूर्ण करावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे.