सांगली : महापूर काळातील सोयाबीनच्या नुकसानीपोटी विम्याची २५ टक्के भरपाई आगाऊ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तशी अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी जारी केली. एकूण पाच महसूल मंडलांतील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल.
भिलवडी व अंकलखोप (ता. पलूस), सांगली, कसबे डिग्रज, कवठेपिरान (ता. मिरज) या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना भरपाई मिळेल. या शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाच्या विमा हप्त्याची रक्कम २३ जुलैअखेर किंवा त्यापूर्वी भरली असणे अपेक्षित आहे. त्यांच्या सोयाबीन पिकाच्या अपेक्षित नुकसानभरपाईच्या २५ टक्क्यांपर्यंत नुकसानभरपाई आगाऊ देण्यात येईल. ही मदत अंतिम भरपाईच्या रकमेतून वळती केली जाणार आहे.
खरीप हंगामात जिल्ह्यातील एकूण ६८ पैकी १७ महसूल मंडलांमध्ये अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झाले. चरण, कोकरूड, सांगाव, मांगले (ता. शिराळा), वाळवा, बहे, ताकारी, तांदूळवाडी, चिकुर्डे (ता. वाळवा), कसबे डिग्रज, कवठेपिरान, सांगली, मिरज (ता. मिरज) व अंकलखोप, भिलवडी, कुंडल, पलूस (ता. पलूस) येथेही सोयाबीनची हानी झाली. त्याची उत्पादकता ५० टक्क्यांपेक्षा कमी अपेक्षित असणारी गावे अशी : पलूस तालुका - भिलवडी - ३५ टक्के, अंकलखोप २७ टक्के. मिरज तालुका - सांगली - ६ टक्के, कसबे डिग्रज व कवठेपिरान ३९. यातील भिलवडी, अंकलखोप, सांगली, कसबे डिग्रज व कवठेपिरान मंडलातील शेतकऱ्यांना आगाऊ भरपाई मिळेल.