सावंतपूर : सध्या देशात सर्वधर्मसमभाव विसरून धर्माच्या राजकारणात हुकूमशाही निर्माण झाल्याने भारतीय राजघटना धोक्यात आली आहे. आज काळ भयानक आहे. दोन महिने आंदोलन करणारा, न्याय मागणारा शेतकरी देशद्रोही ठरतो आहे, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक विश्वनाथ गायकवाड यांनी व्यक्त केली.
समाजवादी प्रबोधिनी, लोकशाही वाचवा कृतिशील विचारमंच, श्री समर्थ साहित्य कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, पलूस ,व्ही. वाय. पाटील प्रबोधन अकॅडमी यांच्या वतीने रामानंदनगर (ता. पलूस) येथे अठरावे परिवर्तन साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून गायकवाड बोलत होते. या आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक विचारमंचावर आयोजित संमेलनाचे उद्घाटन कथाकार हिंमत पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ विचारवंत व्ही.वाय. पाटील, संमेलनाध्यक्ष विश्वनाथ गायकवाड, स्वागताध्यक्ष संदीप नाझरे, निमंत्रक कवि किरण शिंदे, प्रा. रवींद्र येवले यांची प्रमुख उपस्थिती होती. संमेलनाध्यक्ष गायकवाड म्हणाले, हुकुमशाही सगळ्यात जास्त शब्दांना घाबरते. त्यामुळे या अस्वस्थ वातावरणावर लेखणी पाजळली पाहिजे. शब्दांचे सामर्थ्य सूर्यबिंबासारखे विशाल आहे. या परिस्थितीत भूमिका घेऊन शब्दांचा वापर आज आपण नाही केला तर साहित्यिक म्हणून आपण करंटे ठरू, असे वाटते.
हिंमत पाटील म्हणाले, कवी हा अस्वस्थ वर्तमानाचा भाष्यकार असतो. राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचे गांभीर्य अधिक जिवंत करण्याचे सामर्थ्य कवितेत असते.
कवी सरकार इंगळीकर, रघुराज मेटकरी, रमजान मुल्ला, प्रा. लता ऐवळे-कदम, ऋचा वाघमारे, पतू हेरवाडे, ए.डी. पाटील, चंद्रकांत देशमुखे आदींसह अन्य कवींनी कविता सादर केल्या.
चौकट
इलाही जमादार यांना श्रद्धांजली
या संमेलनात कवी रमजान मुल्ला यांनी,
‘वाचलेली एकलेली माणसे गेली कुठे,
पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे’ ही इलाही जमादार यांची गझल गावून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
फोटो-०१सावंतपूर१
फोटो ओळ : रामानंदनगर (ता. पलूस) येथे आयोजित संमेलनात मार्गदर्शन करताना साहित्यिक विश्वनाथ गायकवाड.