अविनाश कोळी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महाराष्ट्रात होणाऱ्या एकूण अपघातात तब्बल ७७ टक्के अपघात हे सरळ असलेल्या मार्गावर होत आहेत. सरळ मार्गावर मानवी चुकांची वाकडी चाल ९ हजार ८७१ लोकांच्या जिवावर बेतली, तर यात १४ हजार लोकांना गंभीर स्वरूपाच्या दुखापतीस सामोरे जावे लागले.
राज्यातील तीन वर्षातील आकडेवारीचा विचार करता, कोणतेही अडथळे नसलेल्या सरळ रस्त्यावर सर्वाधिक अपघात झाले आहेत. २०१९ मध्ये २५,३७० अपघात या सरळ मार्गावर घडले. वळणाच्या वाटेवर एकूण ४ हजार २७१ अपघात होऊन त्यात १ हजार ५८५ लोकांचा बळी गेला. पुलांवरील अपघातांचे प्रमाण तुलनेने खूप कमी आहे.
अंधुक प्रकाश, धुके,, पाऊस,, गारपीट यासारख्या नैसर्गिक अडचणींपेक्षा स्वच्छ सूर्यप्रकाशात सर्वाधिक अपघात झाले आहेत. हीसुद्धा धक्कादायक बाब आहे. राज्यात सरळ रस्त्यावर स्वच्छ सूर्यप्रकाश असताना होणाऱ्या अपघातांचे विश्लेषण केल्यानंतर, मानवी चुकांची मोठी यादी समोर येते. २०१९ मध्ये स्वच्छ सूर्यप्रकाशात ९६ टक्के अपघात घडले. यात १२ हजार ७८८ लोकांचा बळी गेला. अन्य नैसर्गिक अडचणींमध्ये ४ टक्के अपघात झाले. त्यामुळे जर वाहनधारकांनी योग्य काळजी घेत वाहतूक नियमांचे पालन केल्यास रस्त्यावरील अपघातांवर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळविता येऊ शकते.
चौकट
जोडरस्त्यावरील अपघातांचे प्रमाण
जंक्शन अपघात बळी
टी जंक्शन १६३९ ५७९
वाय जंक्शन ७३५ २४९
चौक ७९७ २२२
गोलाकार रस्ता ४१४ १३२
तिरके चौक ३१४ ९९
चौकट
तीन वर्षातील स्थिती...
वर्ष अपघात बळी गंभीर जखमी
२०१७ ३६०५६ १२५११ २०७६७
२०१८ ३५७१७ १३२६१ २०३३५
२०१९ ३२९२५ १२७८८ १९१५२
चौकट
काय करता येईल
रस्त्यांवर गतिमर्यादा तपासणारी यंत्रणा ठिकठिकाणी बसवावी
हेल्मेट व सिटबेल्टबाबत अधिक काटेकाेर तपासणी व्हावी
नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज
मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्यांची दररोज तपासणी व्हावी
मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्यांवर कडक निर्बंध घालावेत