मिरज : मिरज पूर्व भागातील रस्त्यांच्या प्रश्नावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत श्रेयवादाचे राजकारण झाले. काँग्रेसचे उपोषण सुरु असताना आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही धरणे आंदोलन केले. आ. सुरेश खाडे यांनीही मंत्र्यांना भेटून रस्त्यांसाठी निधी मिळविल्याचे जाहीर केले. मिरज-पूर्व भागातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी गेले तीन दिवस उपोषण केले. पालकमंत्री पतंगराव कदम यांना भेटून, रस्त्यांसाठी निधी मिळविण्यासाठी पालकमंत्री पतंगराव कदम यांच्याकडे मुंबईला शिष्टमंडळ गेले होते. रस्त्यासाठी निधीची घोषणा होण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही आज धरणे आंदोलन सुरु केल्याने, काँग्रेस-राष्ट्रवादीतील बेबनाव चव्हाट्यावर आला. रस्त्याच्या प्रश्नाचे श्रेय काँगे्रसला मिळू नये यासाठी राष्ट्रवादीसोबत भाजपचे आमदार सुरेश खाडेही सरसावले. मुंबईत बांधकाममंत्री छगन भुजबळ, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन रस्त्यासाठी निधी देण्याची मागणी केली. त्यावर जयंत पाटील यांनी रस्त्याचे काम सुरु करण्याचे आदेश दिल्याचा दावा केला. रस्त्यासाठी आंदोलनाबाबत रिपाइंने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. रस्ते दुरुस्तीच्या मागणीसाठी खा. संजय पाटील व खा. रामदास आठवले यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे रिपाइंचे प्रकाश इनामदार यांनी निवेदनात म्हटले आहे. काँग्रेसच्या आंदोलनावर भाजपने टीका केली. आपल्याच सरकारविरुध्द आंदोलन करण्याची वेळ मिरज तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर आल्याने, सरकार निष्क्रिय असल्याची टीका भाजपने केली. पन्नास वर्षात त्यांना पूर्व भागातील रस्ते करता आले नाहीत. विधानसभेला आ. खाडे यांना टक्कर देणारा उमेदवार त्यांच्याकडे नसल्याने आपल्याच सरकारविरुध्द उपोषण करीत आहेत. काँग्रेसनेते वैफल्यग्रस्त झाले आहेत. आपल्याच मुख्यमंत्र्यांची बेअब्रू करीत आहोत, याचे भानही काँग्रेसनेत्यांना नाही, अशी टीका भाजप तालुक ा सरचिटणीस रविकांत साळुंखे यांनी केली. (वार्ताहर)
पूर्व भागातील रस्त्यांवरुन पुन्हा श्रेयवाद उफाळला
By admin | Updated: June 13, 2014 01:28 IST