विटा : दुष्काळी भागात सुरू करण्यात आलेल्या विराज शुगर कारखान्याने योग्य वजन व वेळेत बिले दिल्यामुळे शेतकऱ्यांनी विश्वास दाखविला. त्यामुळेच हंगाम यशस्वी झाला असल्याचे प्रतिपादन संस्थापक माजी आ.अॅड.सदाशिवराव पाटील यांनी केले.
विटा (आळसंद) येथील विराज केन शुगर कारखान्याच्या हंगामाची सांगता व साखर पोत्यांचे पूजन माजी आ.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यकारी संचालक संग्राम देशमुख, सरव्यवस्थापक विजय कुलकर्णी, उत्तम पाटणकर, गोविंदराव भोसले, राजेंद्र माने, अमित भोसले उपस्थित होते.
कार्यकारी संचालक देशमुख म्हणाले की, ५०० टन क्षमता असताना ६५० टन प्रतिदिन गाळप करून हंगामात १ लाख २१ हजार टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केले.
माजी नगराध्यक्ष वैभव पाटील म्हणाले की, सर्वात पहिल्यांदा या वर्षीचा हंगाम सुरू करण्याचे धाडस केले. त्यामुळे २१२ दिवस कारखाना यशस्वीपणे गाळप करू शकला.
यावेळी शेती अधिकारी रमेश शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. दीपक पाटील, दीपक जांभळे, अंकुश मंडले उपस्थित होते. संचालक उत्तम पाटणकर यांनी आभार मानले.